Monday, April 28, 2008

सामासिक शब्दांची घटकपदं

मराठीच्या शुद्ध लेखनाविषयीचे नवे नियम येऊ घातलेत. श्री. अरुण फडके ह्यांनी हे नियम कोणत्या प्रकारचे असतील हे लोकसत्तेत एक लेख लिहून सांगितलं आहे. त्याचं स्वरूप काय असेल हे त्या लेखात मांडलं आहे. शुद्ध लेखनात लोकांना येणारी मुख्य अडचण म्हणजे र्‍हस्वदीर्घाची. त्यात अलीकडच्या उच्चाराची ह्या नव्या नियमावलीने दखल घेतलेली आढळते.
पण काही गोष्टी मात्र लेखननियमांत स्पष्ट सांगितलेल्या नसतात. पण प्रत्यक्ष व्यवहारात त्या वापरल्या जाणं फार उपयुक्त ठरतं. मराठीतल्या सामासिक शब्दांची घटकपदं कशी लिहावीत हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जुन्या पद्धतीत ही घटकपदं जोडून लिहिली जात असत. उदा. पत्रकारपरिषद हे सामासिक पद घ्या त्याचा विग्रह पत्रकारांची परिषद असा होतो. आता ह्या दोन पदांचं पत्रकारपरिषद हे समस्त रूप लिहिताना एकतर दोन्ही पदं सलग लिहून पत्रकारपरिषद असं लिहायला हवं किंवा पत्रकार-परिषद असा पदच्छेद दाखवत तरी लिहायला पाहिजे. पत्रकार परिषद अशी वेगवेगळी पदं लिहू नयेत. जुने लेखक हा नियम नीट अनुसरत असं दिसतं. पण नंतर बहुधा इंग्रजीच्या अनुकरणाने सामासिक शब्दांची घटकपदं अशी सुटी लिहिली जाऊ लागली. प्रथम संस्थांच्या नावांत असं लिहिण्याचा प्रघात पडला. उदा. महाराष्ट्र साहित्य परिषद, भारत इतिहास संशोधन मंडळ. शुद्धलेखनविवेक ह्या आपल्या पुस्तकात द. न. गोखल्यांनी संस्थानामांचं लेखन हा सामासिक पदाची घटकपदं सलग लिहावीत ह्या नियमाचा अपवाद मानावा असं नोंदवल्याचं स्मरतं आहे. (मूळ पुस्तक आता हाताशी नाही. त्यामुळे स्मरणावरच विसंबणं भाग आहे.) आजकाल मात्र हा हा प्रकार केवळ संस्थानामांपुरता उरलेला नाही. पहावं तिथे ह्याच स्वरुपात लेखन होताना दिसतं आहे.
सामासिक शब्दांची घटकपदं सलग का लिहावीत? मराठी लेखनात आपण सामान्यतः (अपवाद आहेत पण मोजकेच आहेत) वाक्यातली पदं तोडून लिहितो. म्हणजे दोन सलग लिहिलेल्या खुणांमधली मोकळी जागा ही दोन वेगळी पदं आहेत हे दाखवते. मात्र पदाचे घटक आपण सलग लिहितो. त्यांत मध्ये जागा सोडत नाही. उदा. घोड्या आणि ला ह्यांनी मिळून घोड्याला हे पद साकारलं. आता आपण घोड्या ला असं त्याचं लेखन करत नाही (हिंदीत ते तसं करतात उदा. घोडे को). वाचताना आपण जेव्हा पदांतला संबंध पाहतो तेव्हा ही मोकळी जागा एक काम करत असते. घोड्याला ह्या पदात घोड्या ही प्रकृती आणि ला हा प्रत्यय ह्यांचा संयोग झाला आहे. समासात दोन प्रकृतिशब्दांचा संयोग होतो. उदा. पत्रकार आणि परिषद. हे शब्द सुटे स्वतंत्र शब्द म्हणून वावरू शकतात. समासात ते सलग लिहिले म्हणजे त्या पदांत समासाच्या स्वरूपाचा संबंध आहे हे कळतं. सुटं लिहिल्याने त्यांतला संबंध समासाच्या स्वरुपाचा आहे की अन्य कोणता हे ठरवावं लागतं.
उदा. शंकराचार्य मठातील विहिरीत पडल्याने बालिका जखमी असा बातमीचा मथळा एका वृत्तपत्रात मी वाचला. आणि शंकराचार्य पडल्याने बालिका कशी काय जखमी झाली असेल ह्याचा विचार करू लागलो. वस्तुतः बालिकाच पडली आणि तीच जखमी झाली. पण ती ज्या विहिरीत पडली ती शंकराचार्यांच्या मठातली विहीर होती. आता सामासिक पदाचे घटक वेगळे लिहिल्याने पडलं कोण ह्याविषयी घोटाळा झाला. शंकराचार्यमठाच्या असं लिहिलं असतं तर तो झालाच नसता. अनाथ विद्यार्थि गृह (हे उदाहरण कृ. श्री. अर्जुनवाडकर ह्यांच्या शुद्ध लेखनावरच्या एका लेखातलं आहे.) ह्याचे दोन अन्वय शक्य आहेत. अनाथ विद्यार्थिगृह (म्हणजे विद्यार्थिगृह अनाथ आहे ) आणि अनाथ-विद्यार्थि-गृह (अनाथ विद्यार्थ्यांचे गृह). काय अभिप्रेत आहे हे कसं ओळखणार? कोणी म्हणेल की संदर्भाने कोण पडलं हे कळून येतंच की. हो. खरं आहे. संदर्भाने गोष्टी स्पष्ट होतात. पण संदर्भ उपलब्ध नसेल तर?
पुन्हा जी सोय लिपीत मुळात आहे ती केवळ आळसापोटी दवडण्यात काय अर्थ आहे? अनेकांना ही घटकपदं सलग लिहिली तर शब्दाची लांबी वाढेल अशी अडचण वाटते. आणि ती खरीही आहे. पण अशा वेळी आपण अनुषंगक (- ही खूण) घालून पदच्छेद दाखवून आकलन सोपं करू शकतो. मात्र ह्याही लेखनाला काहींचा आक्षेप आहे. असं लिहिणं डोळ्यांना खटकतं हा त्यांचा आक्षेप. ह्यातही तथ्य आहे हे आपण मान्य करू. पण हा मुद्दा फार महत्त्वाचा नाही. दिसण्यातलं नेटकेपण आणि अर्थग्रहण-अर्थांकनातली सोय ह्यांपैकी कशाला महत्त्व द्यायचं हे उघड आहे. हो वर दाखवला तसा अर्थग्रहणात घोटाळा होतच नाही असं कुणी सिद्ध केलं तर गोष्ट वेगळी.
सामासिक शब्दांची घटकपदं जोडून लिहिल्याने केवळ अर्थग्रहण सोईचं होतं असं नाही तर अर्थांकनातही ही सोय उपयोगी पडते. उदा. मराठी विश्वकोश (मराठी भाषेत असलेला विश्वकोश) आणि मराठी-विश्व-कोश (समजा मराठी लोकांच्या संस्कृतीविषयी, जीवनपद्धतीविषयी कुणी कोश रचला तर त्याला हे नाव मराठी विश्वासंबंधीचा कोश ह्या अर्थाने शोभून दिसेल.)
इंग्रजीत सामासिक शब्दांची घटकपदं कशी लिहावीत ह्याचा काही नेटका नियम नाही. त्यामुळे इंग्रजी लेखन वाचताना अनेकदा आधीचा अन्वय सोडून दुसरा अन्वय स्वीकारावा लागतो. संगणकीय प्रक्रियेत हे फारच त्रासाचं काम ठरतं. शेजारी लिहिलेले दोन शब्द एकमेकांशी संबंधित आहेत की नाहीत हे ध्यानात येत नाही. मराठीत ही प्रथा आधीपासूनच आहे. ती सोडण्यात आणि भोंगळपणाला रान मोकळं करून देण्यात काही अर्थ नाही. हा नियम सोडण्यामागे आळस हेच एक कारण आहे. हे कारण समजण्यासारखं असलं तरी समर्थनीय मुळीच नाही.
साहित्य-महामंडळानेही ह्या गोष्टीकडे लक्ष पुरवायला हवं. आणि आपल्या संस्थेच्या नावापासूनच सुधारणा करायला हवी.


मला आढळलेली काही वाक्यं. ह्यांत सामासिक पदांचे घटक तोडून लिहिल्याने अर्थग्रहणात अडचण येते.

ते पोलीस ठाण्याबाहेरच पत्ते खेळत होते. (कुणी दुसरे पोलिसठाण्याबाहेर पत्ते खेळत होते की स्वतः पोलीसच ठाण्याबाहेर पत्ते खेळत होते)
सीमा प्रश्नाचा पाठपुरावा करणार : मुख्यमंत्री ( प्रश्नाचा पाठपुरावा सीमा करणार तर मग मुख्यमंत्री काय करणार?)

9 comments:

Waman Parulekar said...

आपली मते योग्य आहेत. मराठीतल्या सामासिक शब्दांची घटकपदं जोडून लिहायला हवीत. मी पण तसा प्रयत्न करतोय.

xetropulsar said...

नियम क्र. ११ मधील पहिले वाक्य पटले. अ व आ वर चंद्रकोर ह्या स्वरांना वर्णमालेत स्थान देणे आवश्यक आहे. विशेषत: इंग्रजी शब्द लिहिताना ते आवश्यक असतात.

बाकी, ह्या नियमांना 'मराठी प्रमाणभाषेचे लेखनविषयक नियम' म्हटल्याने केवळ गोंधळ वाढेल. . अर्थात, हे माझे मत. या नियमांप्रमाणे न केलेले लेखन शुद्ध मानले जाईल का अशुद्ध?

केवळ व्याकरणाचे नियम बदलून फार काही साध्य होणार नाही, मराठीचा वापर व्यवहारात वाढवण्यासाठी बाकी‌ उपायांची जास्त गरज आहे. शासनाने पुढाकार घेऊन संगणकावर मराठीचा वापर कसा वाढेल यावर भर देणे आवश्यक आहे.

तत्सम, तद्भव शब्द कसे लिहावेत हा मूळ मुद्दा नाही, विद्यार्थ्यांना व सामान्य मराठी जनतेला साधे साधे शब्द नीट लिहिता आले तरी पुष्कळ आहे. यासाठी शालेय शिक्षणावर भर देण्याशिवाय पर्याय नाही. मराठी शाळांचा दर्जा वाढवून त्या वाचवण्याची गरज आहे.

सुशान्त said...

xetropulsar, नियमांना काय म्हणावं हे मला फारसं महत्त्वाचं वाटत नाही. मला स्वतःला शुद्ध हा शब्द चालतो. त्याचा अर्थ नेमका काय ते कळत असलं की पुरे.
शुद्ध लेखन हे केवळ नियम सोपे केल्याने जमणार नाही ह्या आपल्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. मराठी शाळांचा दर्जा वाढावा ह्यासाठी मराठी-अभ्यास-केंद्राने नुकतीच एक परिषद आयोजित केली होती. हे काम फार मोठं आणि कठीण आहे. पम प्रयत्न करायलाच हवेत.

Anonymous said...

सुशांत नमस्कार!

तुमची मतं रास्त आहेत. मी आपल्या मतांशी एकमत आहे.

मला वाटतं, नवीन 'व्याकरणचिन्हं' व 'त्यांचे वापरण्याचे नियम' हे आपण मांडलेल्या अडचणींवर उपाय होऊ शकतील.

तसेच, 'मराठीच्या शुद्ध लेखनाविषयीचे नवे नियम येऊ घातलेत'या लेखात त्या मोजक्याच मंडळीनी फक्त काही 'र्‍हस्व शब्द' दीर्घ लिहिण्याची, तर काहि त्या अगदि उलट करण्याची गरज कां वाटते ते लेखात मांडलेले नाही. जी मोजकीच मंडळी हे नवीन नियम कायद्याच्या आधारे आणू पहात आहेत त्यांनी आधुनिक तंत्रानुसार लिपीत सुधारणा करायला हवी असे वाटत ही नाही.

"केवळ व्याकरणाचे नियम बदलून फार काही साध्य होणार नाही, मराठीचा वापर व्यवहारात वाढवण्यासाठी बाकी‌ उपायांची जास्त गरज आहे. शासनाने पुढाकार घेऊन संगणकावर मराठीचा वापर कसा वाढेल यावर भर देणे आवश्यक आहे."
xetropulsar, जे म्हणतायत ते ज्यास्त बरोबर वाटतं. कारण विद्यार्थ्यांना वा जनता 'कसं लिहितात' त्यापेक्षा ते 'काय लिहितात' याकडे पहाणे जास्त महत्त्वाचे आहे. घोडं जर शुद्धलेखना ऍवजी 'प्रमाणलेखनावर' अडणार असेल तर लोक 'इंग्रजीच झॅक आहे!' असं म्हंणार.
- सतीश रावले
कार्यकर्ता
मराठी-अभ्यास-केंद्र

सुशान्त said...

सतीश, नमस्कार
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
"नवीन 'व्याकरणचिन्हं' व 'त्यांचे वापरण्याचे नियम' हे आपण मांडलेल्या अडचणींवर उपाय होऊ शकतील." ह्या आपल्या विधानाचा अर्थ नीट कळला नाही. सामासिक पदघटकांच्या लेखनासंदर्भात नव्या व्याकरणचिन्हांची आणि ते वापरण्यांच्या नियमांची काय आवश्यकता आहे हे सविस्तर सांगितलंत तर बरं होईल.
लोक काय लिहितात हे हे महत्त्वाचं आहेच. पण हे लिहिणं वाचणं अधिक शिस्तीचं व्हायचं असेल (ज्ञानव्यवहार करताना ते तसं व्हावं अशी अपेक्षा असते.) तर कसं लिहितात ह्यालाही योग्य ते महत्त्व द्यायला हवं. दुर्दैवाने आपल्या शिक्षणपद्धतीत ह्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. शुद्ध लेखन हा त्या लिहिण्याचा केवळ एक भाग आहे.
नव्या नियमांत काही शब्द ऱ्हस्व तर काही दीर्घ असं होत नाहीए. उलट प्रचलित उच्चाराला महत्त्व देऊन उच्चारात जसं स्थानानुसार ऱ्हस्वदीर्घत्व येतं तसंच ते लिहिण्याचा प्रयत्न दिसतो आणि तो योग्यच आहे असं म्हणावं लागेल.
आणि हे नियम कायद्याच्या स्वरूपातले असणार नाही.तसे ते असू देऊ नयेत.
आपल्या शेवटच्या मुद्द्याशी मात्र मी मुळीच सहमत नाही. प्रमाण लेखनाच्या मुद्द्यावर इंग्रजी ज्यांना झॅक वाटते ते एकतर मूर्ख तरी आहेत नाहीतर लबाड आणि दुटप्पी तरी आहेत. इंग्रजीत प्रमाण लेखन ही भानगड नाही असं थोडंच आहे? तसं नसतं तर मग युरोप-अमेरिकेला जाताना टोफेलची परीक्षा का द्यावी लागते? अमेरिकी उच्चारांचा आग्रह का धरला जातो? ते शिकण्यासाठी पैसे का मोजावे लागतात?
प्रमाण लेखन ही एक सोय असते. त्याचे निकष काय असावेत त्यावर आपण वाद घालू शकतो. वाटल्यास आपल्या पर्यायी व्यवस्था उभारून त्या वापरू शकतो. त्यांची भलावण करू शकतो. माधवराव पटवर्धनांनी आपली लेखनविषयक मतं अशीच स्वतःपुरती अंमलात आणली. त्यांना इंग्रजी झॅक वाटली नाही.

Anonymous said...

सुशांत नमस्कार!

अनुदिनी हा प्रकार 'आपले विचार' प्रकट करण्यासाठी असतो. 'विचार प्रकट करणं वा त्यांचं छान पैकी सादरीकरण करणं' या एवढ्याच बाबतीत एखाद्याने (बहुतांशी एक्कलकोंड्या माणसांनी) समाधान मानायचे असते. कारण आपला विचार इतरांपर्यंत पोहचविणं एवढच ह्या 'ब्लॉग' प्रकाराचं उद्दीष्ट असतं.

मी आपली अनुदिनी वाचली आणि व त्यावर 'अभिप्राय' देणं हि औपचारीकता पाळली. कुठं-कुठं आणि कशी-कशी 'औपचारिकता पाळणं' हे शालेय शिक्षणात शिकवले जात नाही. ते अंगभूत असावं लागते. बहुतेकदा चूका करत जाताना ते शिक्षण मिळू शकते व ते ही शिकायची ईच्छा असेल तर!

वर म्हटल्याप्रमाणेच 'अनुदिनी' वर अनुदिनीलेखकाशी वाद-प्रतिवाद करणं मला तरी 'शिष्ट' वाटत नाही. मला ज्याबाबतीत मतं पटले त्या बाबतीत मी आपल्याशी 'एकमत' *आहे असे म्हटले. 'अभिप्राय लेखन' संपविण्यासाठी जर एखादं वाक्य लिहीलं असेल, तर त्या वाक्याशी 'मी सहमत नाही'** असे म्हणणे योग्य नाही. आता हे आम्हाला शाळेत शिकविले नाही, आपली शिक्षणपद्धतीच बरोबर नाही असं जर आपण म्हणणार असाल तर आपल्या पुढे आमचे हातच टेकले!

*'एकमत' चा अर्थ - चर्चा करताना एका मुद्द्यावर विचार जुळणं. 'जिथं 'एकमत' नसतं तिथं 'दुमत' असतं'

**'सहमत' चा अर्थ - एखादं काम करताना सहकार्य मिळणं/ मिळवणं यासाठीची संमती. कारण -'जिथं सहमती नसते तिथं असहकार असतो.'

आपल्यामध्ये जर वाद-संवाद व्हावा असे वाटात असेल तर आपण मला srawale@rediffmail.com या पत्त्यावर जरुर पत्र पाठवावे. तिथं मला आपल्याशी वाद घालायला आणि संवाद वाढवायला नक्की आवडेल. (खरतरं, यासाठीच मी माझ्या संकेतस्थळाचा पत्ता दिलाच होता.पण ते आपल्या शिक्षणपद्धती........)

- सतीश रावले

सुशान्त said...

सतीश, नमस्कार
रागावलात की काय राव? अनुदिनी ही विचारप्रकटीकरणासाठी आहे हे मान्य. मतमतांतराची अभिव्यक्ती हाही त्या विचारप्रकटीकरणाचाच एक भाग आहे. विचारप्रकटीकरणाचं वाद-प्रतिवाद हे एक अंग आहेच. तो जिथल्या तिथे होणं हेच अधिक सयुक्तिक आहे. त्यामुळे शिष्टाचाराचा भंग होतो असं मला वाटत नाही. उलट मत एका ठिकाणी व्यक्त करायचं आणि त्यावरची मतमतांतरं अन्यत्र मांडायची ह्यात मला शिष्टाचाराचा भंग केल्यासारखं वाटतं. असो. आपली मताभिव्यक्ती प्रामाणिक आहे असं मला वाटलं म्हणून मी माझं वेगळं मत नोंदवलं. आपण केवळ औपचारिक (उपचारापुरती) प्रतिक्रिया लिहिताहात हे कळतं तर आपल्याला वाटणारा शिष्टाचाराचा भंग मी केलाच नसता.
एकमत, सहमत, दुमत ह्यांच्या अर्थाविषयी आपण केलेलं विवेचन आवडलं. ते विचार करायला लावणारं आहे. एकमत आणि सहमत हे शब्द वापरताना मी ह्यापुढे काळजी घेईन.
आपल्याला हा वाद-संवाद आपल्या इ-डाकेवर व्हावा असं वाटत असेल तर तसंही करू.
अनुदिनीचा वापर कसा करावा ह्याविषयी आपल्यात दुमत आहे. ह्यापुढचा वाद-संवाद आपली इच्छा असल्यास आपण इ-डाकेवर करू. ही प्रतिक्रिया इथे अनुदिनीवर लिहिली हा आपल्याला शिष्टाचारभंग वाटला तर तो शेवटचा समजावा. चुकांतून शिकायची इच्छा आहे हे कळावे.

मनीष बावकर said...

सतीश यांचा एकमत/सहमत मुद्दा विचार करण्याजोगा आहे मात्र त्यासाठीचे स्पष्टीकरण ('सहमत' चा अर्थ - एखादं काम करताना सहकार्य मिळणं/ मिळवणं यासाठीची संमती.)पटत नाही, कारण सहकार्य प्रत्यक्ष कृतीशी संबंधीत आहे.एखाद्या व्यक्तिस त्याच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन सहमत होणे म्हणजे सहकार्य करणे.नुसती संमती देऊन सहकार्य करण्याचा अधिकार फक्त भारतीय राजकारण्यांसाठी राखून ठेवला आहे.

श्रद्धा काळेले said...

मी इथे फक्त एक अजून उदाहरणाची भर घालते आहे जे मी 'सकाल' ह्या वृत्तपत्रात वाचले शब्द आहे 'मोफत ढोपरदुखी/गुडघादुखी तपासणी शिबिर'